छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आयोजित तालुका व महानगरपलिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी "राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४” आयोजन करणेबाबत...

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आयोजित तालुका व महानगरपलिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी "राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४” आयोजन करणेबाबत...



आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची सर्व विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनाची उन्नती करावी, यासाठी सारथी संस्थेमार्फत प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी “राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय व महानगरपालिकास्तरीय निबंधस्पर्धा २०२४” आयोजित करण्यात येत आहे. ही निबंध स्पर्धा पुढील ४ वर्ष चालू ठेवण्याचा सारथी संस्थेचा मानस आहे.

सारथी सस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सदर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. इ. ३ री ते ५ वी तसेच इ. ६ वी ते इ. ७ वी व ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी सदरची स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व तालुका व महानगरपालिका स्तरावर घेण्यात येणार आहे.

तालुकास्तरीय निबंधस्पर्धा विषय, नियम व अटी

गट क्र. १ :- इयत्ता ३ री ते इयत्ता ५ वी

विषय:-

अ) राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण.

ब) राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग.

शब्द मर्यादा १०० शब्द


गट क्र. २ :- इयत्ता ६ वी ते इयत्ता ७ वी

विषय:-

अ) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडाविषयक कार्य.

ब) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य.

शब्द मर्यादा - ३०० शब्द


गट क्र. ३ :- इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी

विषय:- अ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि वसतीगृह चळवळ.

ब) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य.

शब्द मर्यादा - ५०० शब्द

नियम व अटी

१. राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४ आयोजनाची दि. १५ जुलै २०२४ ते १७ सप्टेंबर २०२४ ही आहे. या कालावधीत निबंध स्पर्धेचे आयोजन तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी व म.न.पा स्तरावर प्रशासनाधिकारी यांनी करावे.

२. तालुकास्तरीय निबंध स्पर्धा गट क्रमांक १ ते ३ चे आयोजन संबधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांनी करावे.

३. म.न.पा स्तरावर गट क्रमांक १ ते ३ चे आयोजन प्रशासनाधिकारी (शिक्षण) यांनी करावे.

४. छत्रपती शाहू महाराजांचा विचार व कार्य सर्व विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावे यासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना निबंधस्पर्धेत सहभागी करून घ्यावे म्हणून निबंधस्पर्धा तालुका स्तरावर तसेच मनपा स्तरावर घेण्यात येत आहेत. प्रत्येक गटात प्रत्येक तालुक्यातील किमान १००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतील असे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी करावे. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी तसेच प्रशासनाधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करावी.

५.राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४ ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व माध्यमाच्या, सर्व मान्यताप्राप्त शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली आहे.

६. निबंध लेखन स्पर्धाचे माध्यम मराठी असेल.

७. विद्यार्थ्यांनी स्वतः शिकत असलेल्या इयत्तानिहाय गटातून एकाच विषयावर स्वतः निबंध लिहावानिबंधावर विद्यार्थ्याने स्वतःचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव व निबंधाचा विषय नमूद करावा. तसेच निबंधाच्या शेवटी शब्द संख्या नमूद करावी.

८. प्रत्येक शाळेतील निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे निबंध शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी एकत्रित करावेत व तद्नंतर सदर निबंध शाळेच्या लेटर हेडवर मुख्याध्यापकांच्या शिफारशीने व सही शिक्क्यानिशी सदर निबंध गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी म.न.पा यांना दिनांक ३० सप्टेबर २०२४ पर्यंत सादर करावेत.

९. निबंध स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक प्राप्त करणाऱ्या १ ते ३ गटातील विजेत्या १ ते १० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे बँक खातेवर बक्षिसाची रक्कम सारथी, पुणे मार्फत अदा केली जाणार असल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे स्वतःचे नावे राष्ट्रीयकृत बँकेच्या खाते असलेल्या पहिल्या पानाची सत्यप्रत निबंधासोबत जमा करणे आवश्यक आहे.

१०. सारथी मार्फत तालुकानिहाय व मनपानिहाय यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. प्रत्येक तालुका व म.न.पा कार्यालयाकडे प्रशस्तीपत्रे पोस्टाद्वारे पाठविण्यात येतील.


११. तालुका स्तरावरील निबंध स्पर्धेच्या प्रत्येक गटासाठी गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांनी तीन तज्ञ परीक्षक शेजारच्या तालुक्यातील नियुक्त करावेत. त्यांचेकडून निबंध स्पर्धेचे परीक्षण करून १ ते १० क्रमांक घोषित करावेत. निबंध स्पर्धेचे परीक्षण- आशय- २५ गुण, , अभिव्यक्ती - ५ गुण, भाषाशैली- ५ गुण, शुद्धलेखन- ५ गुण, वळणदार हस्ताक्षर व प्रभाव - १० गुण एकूण ५० गुणांच्या आधारे मूल्यमापन करावे.

१२. निबंध स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या तिन्ही गटातील प्रत्येकी गुणानुक्रमे १ ते १० विद्यार्थ्यांची यादी सारथी संस्थेस ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सादर करावी. (त्यामध्ये विद्यार्थ्याचे नांव, शाळेचे नांव व पत्ता, ई-मेल, स्पर्धेचा विषय, प्राप्त क्रमांक, विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक, बँक तपशील, नांव, खाते क्रमांक, IFSC Code, बँकेचे नांव, शाखा इ. माहिती सादर करावी.) तसेच व पारितोषिक प्राप्त असणाऱ्या १ ते ३ गटातील विजेत्या १ ते १० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे निबंध सारथी कार्यालयास सादर करावेत.

१३. निबंधस्पर्धेत विजेत्या ठरलेल्या १ ते ३ गटातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती इंग्रजी भाषेतच खाली दिलेल्या लिंकवर अचूक भरावी. लिंकवर माहिती भरणे आवश्यक आहे.


A) गट क्रमांक १ इयत्ता ३ री ते ५ वी च्या विजेत्या स्पर्धकांसाठी https://forms.gle/NrV2RahgG4f2aTfv8 ही लिंक आहे.


B) गट क्रमांक २ इयत्ता ६ वी ते ७ च्या विजेत्या स्पर्धकांसाठी https://forms.ple/yYJ3yLy1pF6WMAs97 ही लिंक आहे.


C) गट क्रमांक ३ इयत्ता ८ वी ते १० वी च्या विजेत्या स्पर्धकांसाठी https://forms.gle/CSJy5kz6fRduAP306 ही लिंक आहे.


१४. गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी म.न.पा यांनी निबंधस्पर्धा संपन्न होताच स्पर्धेविषयी आपला संक्षिप्त अहवाल निकाल पत्रकासोबत पुढील नमुन्यात सादर करावा. तसेच सदर स्पर्धेविषयी आपला अभिप्राय सुमारे १० ओळीत सही शिक्क्यासह सादर करावा.



१५. गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांनी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत निबंध स्पर्धेचा निकाल व स्पर्धा सहभाग अहवाल सह व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी उपकेंद्र बचत गंगा इमारत कसबा बावडा रोड, रमणमळा, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क शेजारी कोल्हापूर ४१६००३ या पत्त्यावर खास दूताकरवी समक्ष अगर स्पीड पोस्टाने सादर करावा.

१६. प्रत्येक जिल्ह्यात सर्वाधिक निबंध (गट क्र. १ ते ३) मिळून प्राप्त होणाऱ्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी व मनपा प्रशासनाधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सारथी मार्फत गौरविण्यात येईल.

१७. छत्रपती शाहू महाराज निबंधस्पर्धेविषयी उपरोक्त नमूद केलेल्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक मुख्यालय सारथी पुणे यांनी राखून ठेवलेले आहेत.

शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच खाजगी शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना या निबंधस्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गट शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी मनपा मार्फत परिपत्रकाद्वारे व आढावा बैठकीद्वारे सर्व शाळांना कळविण्यात यावे. प्रत्येक तालुक्यातून व मनपा स्तरावरून प्रत्येक गटातून किमान १००० निबंध इयत्ता (३ री ते ५वी, ६ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी ) प्राप्त होतील याबाबतचे नियोजन गट शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांनी करावे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचा सदर निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घ्यावा व राजर्षी शाहू विचारांची चळवळ गतिमान व्हावी यासाठी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेची माहिती द्यावी. राजर्षी शाहू विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या अधिनस्त सर्व गट शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी (न.पा, म.न.पा.) अधिकाऱ्यांना सदर स्पर्धेविषयी कळविण्यात यावे व सदर राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय व म.न.पा स्तरीय निबंधस्पर्धा यशस्वी करावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.